कंपनीच्या कार्याचा परिचय

'महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि.' (संक्षिप्त नांवः 'महापारेषण', Mahatransco किंवा M.S.E.T.C.L.) ही संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या मालकीची, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे.

पूर्वीच्या ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ’ या संस्थेची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर जून २००५ मध्ये ‘महापारेषण’ कंपनी अस्तित्वात आली. विजेच्या निर्मिती स्थानापासून ते वितरण केंद्रापर्यंत वीज पोहोचविण्याची म्हणजेच विजेचे पारेषण करण्याची जबाबदारी महापारेषण कंपनीवर आहे. यासाठी महापारेषण कंपनीची विधीवत रचना करण्यात आली. विजेचे पारेषण हे सुरक्षितपणे, तसेच विजेची कमीत-कमी हानी होईल आणि तिचा भार समतोल राहील, अशा पध्दतीने करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे कार्य ‘महापारेषण’ कंपनी करीत आहे.

या साठी ‘महापारेषण’ने राज्यात सर्वव्यापक अशी पारेषण यंत्रणा उभारली आहे. यामध्ये विविध क्षमतेच्या वीज वाहिन्या, त्यांचे मनोरे, खांब, इत्यादी साहित्य यांचा वापर होतो. तसेच विजेचे वेगवेगळया क्षमतेच्या भारात रूपांतरण करण्यासाठी ठिकठिकाणी ट्रान्स्फॉमर्स, वीजग्रहण केंद्र, वीज उपकेंद्र, इत्यादी उभारणे व त्या सर्वांची देखभाल करणे, व्यवस्थापनासाठी कार्यालये, कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण केंद्र इत्यादी आस्थापना स्थापन करणे आदी कामांचा समावेश होतो. या सर्व बाबींचा विचार केल्यास संपूर्ण भारत देशात ‘महापारेषण’ ही पारेषण सेवा देणारी सर्वात मोठी राज्यपारेषण कंपनी ठरली आहे. आज ‘महापारेषण’ कंपनीच्या वीज वाहिनींची एकूण लांबी ४६२१७.९० सर्किट किलोमीटर्स एवढी प्रचंड आहे. कंपनीच्या अति उच्च क्षमतेची वीज उपकेंद्राची संख्या ६६० या बरोबरच १ लाख ४ हजार ३७७ एंम.व्ही.ए. एवढी पारेषण क्षमता आहे.

या पायाभूत सेवेद्वारे ‘महापारेषण’ कंपनी संपूर्ण महाराष्ट्रात वीज (वहनाचे) पारेषणाचे काम सातत्याने करीत आहे. महाराष्ट्र राज्याच्या शेजारी राज्यांतही ती सेवा देते. ही संपूर्ण यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी ‘महापारेषण’चे आपल्या अधिकार क्षेत्रात म्हणजे महाराष्ट्र राज्यात २ भार प्रेषण केंद्रे, ५५९ इ.एच.व्ही. उपकेंद्रे, ग्रहण केंद्रे, सात परिमंडळातंर्गत कार्यालये, मंडळे, विभाग, स्थापत्य विभाग, भांडार केंद्रे, दूरसंचार विभाग, प्रशिक्षण केंद्रे आदी आस्थापना कार्यरत आहेत. या यंत्रणेचे व्यवस्थापन व देखभाल ही कंपनी करते. तसेच भविष्यातील वाढती वीजनिर्मिती व जनतेच्या गरजा यांचा अंदाज घेऊन विस्ताराच्या योजना आखणे व त्या अंमलात आणणे हे कार्य ही कंपनी करीत आहे.

उच्चदाबाची दीष्टधारा योजना (HVDC)

महापारेषण कंपनीचे एक वैशिष्टय म्हणजे संपूर्ण देशात राज्य शासनाची मालकी असलेली विजेची उच्चदाबाची दीष्टधारा प्रणाली फक्त महापारेषण कंपनीकडे आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला चंद्रपूर येथुन मुंबई नजीक पडघे येथपर्यंत ४६२१७.९० सर्किट किलोमिटर्स लांबीची बाय पोलर वीज वाहिनी प्रणालीचे यशस्वी संचालन कंपनी करीत आहे. या प्रणालीची क्षमता 3582 मे.वॅ. 500 केव्ही बाय पोलर एवढी मोठी आहे. या प्रणालीचे यशस्वी संचालन करणे हा महापारेषण कंपनीच्या कार्यातील एक मानाचा तूरा आहे. कारण महाराष्ट्राच्या पूर्व भागात कोळसा खाणी असल्याने वीज निर्मितीचे मुख्य साधन असणारा कोळसा तेथे सहज उपलब्ध आहे. त्यामुळे तेथे वीज निर्मिती करणारी केंद्रे, चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा या ठिकाणी आहेत. तर विजेची जास्त मागणी व वापर मुंबई-पुणे-नाशिक या परिसरात आहे. या मागणी क्षेत्रात वीज वाढविली जाते. अतिउच्च दीष्टधारा प्रणालीत पारेषण करताना विजेची पारेषण हानि ही अत्यल्प असते. त्यामुळे चंद्रपूर येथून जेवढी वीज पाठविली जाते, सुमारे तेवढीच वीज पडघा येथे येत असते.

 

भार प्रेषण केंद्रे (Load Dispatch Centers)

वीज पारेषण यंत्रणेचे संचालन, निरीक्षण व नियंत्रण हे काम ‘भार प्रेषण केंद्रा’मार्फत होत असते. हे केंद्र म्हणजे पारेषण व्यवस्थेचे हृदय आहे. मुंबईनजिक कळवा आणि नागपूर येथील अंबाझरी ही ‘महापारेषण’ कंपनीची राज्य भारप्रेषण केंद्रे आहेत. या भारप्रेषण केंद्राच्या कामाचे संपूर्णपणे संगणकीकरण केले आहे. तसेच तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे.

भविष्यातील योजना

येत्या 5 वर्षात वीज निर्मिती मध्ये आणि मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन वीज पारेषणाची एक शक्तिशाली रचना करण्याचे उद्दिष्ट महापारेषणने ठेवले आहे. वर्ष 2015-16 या कालावधीसाठी क्षमता वाढविण्याची एक महत्वकांक्षी योजना कंपनीने हाती घेतली आहे. त्यातून वीज निर्मिती केंद्रात तयार झालेल्या विजेचे निस्कासन (Evacuation) करणे व एक शक्तिशाली वीज पारेषण जाळे (Grid) या द्वारे ती महाराष्ट्राच्या कानाकोपयापर्यंत पोहोचविणे या गरजांची पूर्तता होईल. महापारेषणने पूर्व अंदाज घेऊन त्यानुसार यंत्रणेची देखभाल व सुधारणा करण्याचे धोरण ठरविले आहे. यामुळे वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. महापारेषणच्या वीज जाळयाची उपलबधता 99.73 टक्के (HVAC) आणि 99.30 टक्के (HVDC) एवढी सुधारली आहे.

 

मूल्य निर्मिती व मर्यादित खर्चासाठी उपाययोजना

‘महापारेषण’ कंपनीने आपल्या कार्यात मूल्याची निर्मिती करणे व खर्च मर्यादित ठेवणे यावर भर दिला आहे. त्यासाठी खालील उपाययोजना केल्या आहेतः-
  • ‘महापारेषण’च्या ५३० वीज उपकेंद्रात ऊर्जेचा लेखा ठेवणे यासाठी ABT मीटर्स स्थापन करण्यात आले आहेत.
  • महत्त्वाच्या विभागात संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन कामे केली जातात, त्यासाठी इ.आर.पी. एकात्मिक संगणक प्रणालीचा वापर होतो.
  • सर्वंकष संपर्कासाठी विद्यमान पायाभूत सुविधा यामध्ये २ हजार ८०१ किलोमीटर्स लांबीची ऑप्टीकल फायबर केबल सिस्टम (प्रकाशकीय तंतुमय तारा) प्रणालीचा वापर करून एक प्रभावी संपर्क प्रणाली सुरू करण्यात येत आहे.
  • विना कर्मचारी चालणारी (Unmanned) आणि दूरवरून नियंत्रण करण्याजोगी (Remote Control) वीज उपकेंद्रे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयत्न ‘महापारेषण’ने केले आहेत.
  • वायूद्वारे निरोधित वीज उपकेंद्रे (Gas Insulated S/S – G/S) भांडूप (मुंबईनजीक) आणि हिंजेवाडी (पुणेनजीक) सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
  • कळवा व अंबाझरी येथील राज्य भार प्रेषण केंद्राचे नुतनीकरण अद्ययावतीकरणासाठी १४० स्काडा-आर.टी.यू. म्हणजेच पर्यवेक्षण नियंत्रण व माहिती संग्रहण आणि दूरस्थ अग्र कक्ष (Remote Terminal Unit RTU) या पध्दतीचा वापर करण्यात येतो.
  • औरंगाबाद येथे ७६५ केव्ही एवढ्या प्रचंड क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.
  • समभाग भांडवल (Equity Capital) / भांडवली खर्च उभारण्यासाठी खुल्या बाजारातून निधी मिळविण्यासाठी महापारेषण I.P.O. अर्थात प्रारंभिक सार्वजनिक देकार तयार करणार आहे.

कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण केंद्रे

आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करता यावे यासाठी ‘महापारेषण’ने प्रशिक्षणाच्या सोयी सुरू केल्या आहेत. कंपनीने राष्ट्रीय प्रशिक्षण धोरण स्वीकारले आहे व राज्यात वेगवेगळ्या ७ ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. ती तेथील परिमंडळ कार्यालयांशी संलग्न आहेत. तेथे तांत्रिक सुरक्षा, कौशल्ये, व्यवस्थापन, लेखा, संवाद कौशल्य आदी नव्या पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना मुख्यालयातील मानव संसाधन प्रशिक्षण विभागाकडून मार्गदर्शन केले जाते व त्यांच्या कामाचे वेळोवेळी निरीक्षण केले जाते.

अलीकडेच औरंगाबाद येथे विद्युत प्रणाली अध्ययन केंद्र सुरू करण्यात आले.(The Power System Learning Centre) या प्रशिक्षण केंद्रात कर्मचाÚयांना वीज प्रणालीचे व विविध साहित्यांचा वापर, प्रशिक्षण, देखभाल, सुरक्षा, संशोधन आणि विकास याविषयी प्रशिक्षण दिले जाते.

 

‘महापारेषण’च्या या प्रशिक्षण धोरण व प्रत्यक्ष कार्यवाही याची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली व त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. नवी दिल्लीच्या भारतीय प्रशिक्षण व विकास संस्था (Indian Society for Training & Development, New Delhi) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेने वर्ष २०११ चा विशेष गौरवाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘महापारेषण’ कंपनीला प्रदान केला.

अशाप्रकारे, ‘महापारेषण’ कंपनीतील आम्ही सर्व शक्तीनिशी ‘सर्वांसाठी वीज’हे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी बांधील आहोत.

This page was last updated on 14 Jun 2024